ऋषिपंचमीचे व्रत का आचरतात? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व मान्यता

ऋषिपंचमीचे व्रत का आचरतात? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व मान्यता

भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ऋषिपंचमीचे व्रताचरण, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया…

ऋषिपंचमी : शनिवार, ११ सप्टेंबर २०२१। भाद्रपद पंचमी प्रारंभ : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे.
भाद्रपद पंचमी समाप्ती : शनिवार ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजून ३७ मिनिटे.
ऋषी पूजनाचा मुहूर्त : शनिवार ११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटे ते दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटे.

ऋषिपंचमीचे व्रत- भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते.

या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

ऋषिपंचमी पूजा मंत्र
कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।

ऋषिपंचमीचे महत्त्व- गृहस्थाश्रमी पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचारसंपन्न व्हावा, असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते.

ऋषिपंचमीला याच भाज्या करतात- महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.

Team Beauty Of Maharashtra