सर्वपित्री अमावस्या : सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध विधी करावे? वाचा

सर्वपित्री अमावस्या : सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध विधी करावे? वाचा

सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला कोणत्या मुहुर्तावर श्राद्ध कार्य करावे? सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध करावे? सर्वपित्री अमावास्येविषयीच्या मान्यता, महत्त्व जाणून घेऊया…

भाद्रपदाचा वद्य पक्ष हा विशेष मानला जातो. कारण संपूर्ण १५ दिवस पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते. पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असा आपल्याकडे समज आहे. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या.

सर्वपित्री अमावास्या विशेष मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला कोणत्या मुहुर्तावर श्राद्ध कार्य करावे? सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध करावे? सर्वपित्री अमावास्येविषयीच्या मान्यता, महत्त्व जाणून घेऊया…

सर्वपित्री अमावस्या मुहूर्त- सर्वपित्री अमावास्या : बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१
– भाद्रपद अमावास्या प्रारंभ : मंगळवार, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ०७ वाजून ०५ मिनिटे.
– भाद्रपद अमावास्या समाप्ती : बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३५ मिनिटे.
– श्राद्ध कार्यासाठी योग्य मुहूर्त : बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजून ३६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २४ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्वपित्री अमावास्येला करावयाचे श्राद्ध कार्य बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जात आहे.

सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व- वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावास्येचे शुभ योग- सूर्य हस्त नक्षत्रात असताना अमावास्या आली व त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजच्छाया योग म्हणतात. हा योग भाद्रपद वद्य अमावास्येलाच येतो. यंदा सर्वपित्री अमावास्या प्रारंभी उत्तरा तर समाप्तीवेळी हस्त नक्षत्र आहे. या दोन्ही नक्षत्रांवर केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ फलदायी मानले गेले आहे. श्रीकृष्णानेही सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते.

सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध विधी करावे?–पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते.

एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते

Team Beauty Of Maharashtra