‘मन उडु उडु झालंय’ मालिकेतील सानिका च्या खऱ्या लाईफबद्दल !

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक असं वळण येतं जिथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. हे वळण एखाद्या संधीच्या रुपात येतं. मिळालेल्या या सुवर्णसंधीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कलाकार नेहमी प्रयत्नशील असतो. रीना मधुकर हे यापैकीच एका कलाकाराचं नाव.
सध्या ‘मन उडु उडु झालंय’ या मालिकेतील तिच्या सानिका या व्यक्तिरेखेचं कौतुक होतंय. पुण्यातून शिक्षण पूर्ण केलेली रीना हीनं लोकनृत्याचा अभ्यास केला आहे. ती लोकनृत्याचे अनेक कार्यक्रम करत होती. अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिला ज्येष्ठ दिग्दर्शक-कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भेटले.
तिचं नृत्य पाहून त्यांनी तिची ‘अजिंठा’ या चित्रपटातील कमला हे मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी निवड केली. या चित्रपटाच्या आधी तिनं ‘क्या मस्त है लाइफ’ या टीव्ही शो मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. तसंच आमिर खानच्या ‘तलाश’ या चित्रपटात रीना आमिर खानच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत दिसली.
हा चित्रपट तिच्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरलं. या चित्रपटानं तिला मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिलंच आणि त्याबरोबर ‘एजंट राघव’ या हिंदी मालिकेत फॉरेन्सिक डॉक्टर आरती मिस्त्रीची मध्यवर्ती भूमिकाही मिळवून दिली.
‘नितीन देसाई यांनी दिलेल्या संधीमुळे मी अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. अभिनय करताना अनेक लोक भेटले. त्यांनी आशीर्वाद दिले. त्याच पुण्याईने मी आज इथवर आले आहे. ‘मन उडु उडु झालंय’च्या निमित्त पहिल्यांदा मराठी मालिकाविश्वात काम करतेय.
पुन्हा माझ्या घरी परतल्याचं समाधान आहे’, असं रीना म्हणते. ‘हातीम’, ‘महारक्षक आर्यन’ या मालिकांत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यात. ‘बेहेन होगी तेरी’ या हिंदी आणि ‘झाला बोभाटा’, ‘३१ दिवस’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या मराठी चित्रपटांत रीना मुख्य भूमिकेत दिसली आहे.
रीनानं रंगभूमीवरसुद्धा छाप सोडली असून लोकनृत्यानं सुरू झालेला तिचा प्रवास आता मनोरंजनसृष्टीत कमालीचा सुरू आहे.